मंत्रिमंडळ निर्णय:दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यासह पात्रतेसाठी कुटुंबाच्या आर्थिक मर्यादेत वाढ

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यासह योजनेच्या लाभासाठी असलेल्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत 21हजार रुपयांवरून 50 हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार 40 टक्के ते 79 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना प्रतिमाह 800 रुपये तर 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना प्रतिमाह एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 1 लाख 35हजार 512 दिव्यांग व्यक्तींना होणार आहे.सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 40 टक्के ते 79 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना प्रतिमाह 600रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात 200 रुपयांची वाढ करून आता प्रतिमाह 800 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमध्ये 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. या केंद्र पुरस्कृत योजनेमधून लाभार्थ्यांना प्रतिमाह 200 रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते. याच योजनेतील लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून प्रतिमाह 400 रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या एकूण 600 रुपये इतक्या अनुदानात 400 रुपयांची वाढ करण्यात आल्याने आता त्यांना प्रतिमाह 1000 रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या 34.13 कोटी इतक्या वार्षिक खर्चासही आज मान्यता देण्यात आली.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या आणि 65 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या अस्थिव्यंग,अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग स्त्री व पुरुषांना राज्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या आणि 65 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट-अ या योजनेंतर्गत लाभ दिला जातो. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट नसणाऱ्या, मात्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या आणि 65 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनाही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट-ब या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading