हिंगोली (फेरोज़ पठाण)
हिंगोली ते वाशिम मार्गावर कलगाव पाटी अन्नं पूर्ण शाळा जवळ भरधाव ट्रक ने जीपला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सहा जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी ( ता. २0 ) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातातील सर्व सहा जण वाशिम जिल्हातील आडगांव येथील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम येथून एक जीप मध्यरात्रीच्या सुमारास हिंगोली कडे येत होती. ही जीप हिंगोली शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आली असतांना हिंगोली कडून वाशिम कडे जाणाऱ्या ट्रक ने जीपला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये जीपमधील सहा जण ठार झाले आहेत.या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक डॉ. सिध्देश्वर भोरे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती थोरात,हिंगोली वाहतुक शाखेचे पोनि सुरके, उपनिरीक्षक किशोर पोटे, शेख जावेद,रमेश ठाकूर, किशोर कातकडे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
अपघातामध्ये जीपचा चुराडा झाला आहे. हि धडक एवढी जबरदस्त होती की यामध्ये ट्रकच्या समोरील चाकांचे रॉड तुटून गेले. अपघातानंतर ट चालकाने घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी दरवाजे तोडून मयतांना बाहेर काढले. या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या दोघांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करुन नांदेड़ येथे हलवण्यात आली आहे.
अपघातात मयत झालेले सहा जण 30 ते 35 वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मयत हे वाशिम जिल्ह्यातील आडगाव येथील असल्याचीही पोलिसांनी स्पष्ट केले. या अपघातानंतर हिंगोली ते वाशिम मार्गावरील वाहतूक रात्री दोन वाजल्यापासून ठप्प झाली होती पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती. त्यामुळे वाहनांच्या हिंगोली वाशिम कडे मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. अपघातामधील मयत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
या भिषण अपघातात सहा जणाचा बळी गेला असल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे