दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेत नांदेड जिल्हा राज्यात अव्वल.
सिईओ अशोक काकडे यांनी केले अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक
नांदेड,8- महाराष्ट्र राज्य जिवोन्नती अभियानांतर्गत बेरोजगारांना दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून विविध विषयाचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणात नांदेडच्या ग्रामीण विकास यंत्रणेने प्रशिक्षणाचे उद्दीष्ट साध्य करुन राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतूक केले आहे. दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत राज्य शासनाने नांदेड जिल्हयास विविध प्रशिक्षणासाठी 863 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 756 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक प्रशिक्षणाचे उद्दिष्ट नांदेड जिल्हयाने साध्य करत राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे बेस्ट डिस्ट्रीक आवार्ड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिनांक 25 सप्टेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. या कौतुकास्पद कामगीरीबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी व त्यांचे अधिनिस्त अधिकारी व कर्मचारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी कौतुक केले आहे. दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून सेक्यरीटी गार्ड, डी.टी.पी., टॅली, रिटेल स्टोअर्स ऑपरेशन असिस्टंट आदी विषयाचे प्रशिक्षण देण्यात येते. नांदेड जिल्हयात आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी 363 लाभार्थ्यांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक डी.व्ही.राठोड, विस्तार अधिकारी जी.व्ही.पातेवार, कार्यालयीन अधिक्षक एस.एन.लाड, जिल्हा व्यवस्थापक वित्तीय समावेशक डी.एच.देशपांडे, सारीका कदम, संध्या तुंगेनवार यांच्यासह जिल्हा व तालुका समन्वयक यांनी पुढाकार घेतला होता.