भिगवण : काँग्रेस पक्षासोबत युती करावी असे काही नाही. मात्र, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी ३७ ठिकाणी उमेदवार मिळत नाहीत. काँग्रेस पक्ष वाचला पाहिजे असे आम्हाला वाटते. त्यांना जर वाचायचे नसेल तर आम्हाला त्यांना वाचवण्यात स्वारस्य नाही. जे पक्ष विकाऊ आहेत (आरपीआय) त्यांच्याशी आम्ही कधीच युती करणार नाही. वेळ पडल्यास बहुजन वंचित आघाडी सर्वच्या सर्व जागा लढवेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी भिगवण (ता. इंदापूर) येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बाबीर देवस्थान येथे यात्रेसाठी जाताना त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. ते म्हणाले, की सध्या घराणेशाही वाढतच चालली असून, त्यांनी आपले चारित्र्य तपासावे. सेना आणि भाजपाला धनगर ही जात मतदान करते. त्या वेळी १२ टक्के मतदान हे आमच्याकडचे जाते. सेना-भाजपाची सत्ता कोण घालवू शकत असेल तर ते फक्त आम्हीच घालवू, असा दावा आंबेडकर यांनी केला.