बई : पुलवामा हल्ला मोदी सरकारचे मोठे अपयश आहे. पुलवामा हल्ला मुत्सद्दीपणाचा, राजकीय आणि गुप्तचर यंत्रणेचा पराभव असून, येथील मुस्लीम समाजाच्या अधोगतीस काँग्रेस सरकारही जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली
.दादर येथील शिवाजी पार्कमध्ये शनिवारी सायंकाळी वंचित बहुजन विकास आघाडीची विराट सभा पार पडली. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.ओवेसी म्हणाले, पुलवामामध्ये झालेला भ्याड हल्ला हा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. हल्ला झाला तेव्हा देशातील सुरक्षा यंत्रणा काय करीत होत्या, याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. ४० जवान या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यास पाकिस्तान सरकार, आयएसआय, दहशतवादी जबाबदार आहेत. पाकिस्तानकडून आधी उरी, पठाणकोट आणि आता पुलवामा झाले. त्यामुळे पाकिस्तानच्या शब्दांवर आमचा विश्वास नाही. पाकिस्तानी मंत्री म्हणतो की, युद्ध झाले तर मंदिरातील घंटा वाजणार नाही. तुम्ही देशाला ओळखले नाही. येथे जोवर मुस्लीम आहे तोवर मशिदींतून अजान, मंदिरांतून घंटानाद, चर्च, गुरुद्वारांमधून प्रार्थनेचे सूर उमटत राहतील. जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्व एक असतो. पाकिस्तानी नेत्यांनी भारतातील मुस्लिमांची काळजी करण्याचे सोडून द्यावे.