किनवट, दि.18 (अक्रम चौहन): सत्तेतील भाजपा-शिवसेना असो की, विरोधी पक्षातील काँग्रेस-राष्ट्रवादी असो, हे सर्वच लोक ‘सापनाथ-नागनाथ’ आहेत. यांना यापुढे कधीही सत्ता मिळू दिली नाही पाहिजे. दिल्लीसारखा राज्याचा खरा विकास होण्यासाठी ‘आप’ ला संधी द्या, असे प्रतिपादन आपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले.
आम आदमी पार्टी, किनवट-माहूर विधानसभा द्वारा आज सोमवारी (दि.18) दुपारी 2 वाजता तहसील कार्यालय परिसरातील मैदानावर आयोजित जाहीर सभा व पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना सावंत म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पार्टीचे शासन आहे. तिथे आम्ही विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. एक आदर्श मॉडेल म्हणून तुम्ही दिल्लीच्या विकासात्मक कार्याकडे पाहू शकता. ‘आप’ नेे आता महाराष्ट्रात एन्ट्री घेण्याचे ठरविले असून, राज्यात होत असलेला भ्रष्टाचार, सांप्रदायिकता, असहिष्णुता नष्ट करण्यासाठी आपल्याही विधानसभेत आम आदमी पार्टी सक्रीय होत आहे. दिल्लीत जी विकासाची क्रांती घडवून आणली, त्याच धर्तीवर आम्ही महाराष्ट्रातही विकास करू इच्छितो. गोर गरीब, दुर्बल घटक, शेतकरी-शेतमजुर, त्रस्त व्यापारी व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी जनतेने आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील आप शासनाने देशात सर्वप्रथम स्वामिनाथन आयोग स्विकारला आहे. त्यामुळे त्या प्रदेशातील शेतकर्यांना न्याय मिळून त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. सध्या आमचे देशातील विविध राज्यात सुमारे 100 आमदार असून, 7 खासदार आहेत. त्यामुळे लवकरच आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यापूर्वी आपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रंगा राचुरे, युवा प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे, पंढरीनाथ ठाकरे यांचीही जोशपूर्ण भाषणे झालीत. सभेचे सूत्रसंचालन किनवट विधानसभा अध्यक्ष पी.एस.चाटसे यांनी केले. प्रास्ताविक आपचे हिंगोली लोकसभा अध्यक्ष मारोती भरकड यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.मोहनावती राऊत यांनी मानले. सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. सभेच्या यशस्वितेसाठी किनवट तालुका अध्यक्ष शिवाजी काळे, माहूर ता.अध्यक्ष महेंद्र पुरी, उपाध्यक्ष संतोष देशमुख आदींनी परिश्रम घेतले