पुणे : शिधापत्रिकेवर नागरिकांना रास्त धान्य आणि साखरेबरोबरच आहाराची सकसता वाढविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने पाऊल उचलले आहे. महिलांमधील अॅनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने ‘लोह आणि आयोडिनयुक्त’ मीठ पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी ७५ टन मिठाची मागणी नोंदविल्याची माहिती अन्न धान्य पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू, तांदूळ, साखर देण्यात येते. देशासह राज्यात अॅनिमियाचे प्रमाण वाढत आहे. चौथ्या आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यात सहा महिने ते ५ वर्षे वयाच्या ५३.८ टक्के मुलांत आणि १५ ते ४९ वर्षे वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के इतक्या भयंकर प्रमाणात अॅनिमियाग्रस्तांचे प्रमाण आढळले आहे.
लोह आणि इतर पोषक द्रव्ये मिळाल्यास अॅनिमिया नियंत्रणात आणता येऊ शकतो. अॅनिमिया नियंत्रणात आणण्यासाठी लोह व आयोडिनयुक्त मीठ वितरीत करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने सरकारकडे सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून १२ महिन्यांसाठी लोहयुक्त मीठ पुणे व नागपूर शहरातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लोह व आयोडिनयुक्त (डबल फोर्टिफाइड) मीठ सुरुवातीस १२ महिन्यांसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्टमार्फत या मिठ पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांना हे मीठ १४ रुपये किलो दराने उपलब्ध असेल.