मुंबई – राज्यातील मेगाभरतीच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात भरतीच्या जाहिराती येणार असून 72 हजार पदांसाठी ही मेगा भरती आहे. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात या पदांसाठी परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण लागू झाल्याने मराठा समाजातील मुलांना या भरतीचा फायदा होणार आहे. तसेच मराठा समाजातील मुलांना राज्यातील विविध विभागात आरक्षणाच्या माध्यमातून पद मिळवण्याची ही मोठी संधी असणार आहे. राज्यातील प्रशासनाच्या विविध विभागात गेल्या अनेक वर्षांपासून पदे रिक्त आहेत. शासनाच्या या रिक्त जांगांच्या भरतीच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. एकूण 72 हजार पदांची मेगा भरती असून दोन टप्प्यात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी 36 हजार पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून प्रामुख्याने कृषी व ग्रामविकास विभागातील पदे भरली जाणार आहेत. या निर्णयामुळे युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात यांसदर्भातील जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.राज्य शासनाच्या विविध विभागातील 72 हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यातील 36 हजार पदे यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यास त्यांनी मान्यता दिली. उर्वरित 36 हजार पदेही लवकरच भरण्यात येणार आहेत.