माहूर(अकरम चव्हाण) :- इराण-इराक यात्रा करून दिनाक २ मार्च रोजी मायदेशी भारतात परतलेल्या १४ लोकांना नागपूर येथील सामान्य रुग्णालयात तपासणी कामी डॉक्टरांच्या निगराणी ठेवण्यात आले असताना डॉक्टरांना कुठलीही सूचना न देता दोन इसम गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी माहूर येथील सोनापीर उर्स साठी निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यासंदर्भात नागपूरच्या जिल्हा शल्यचिकित्सकाने यवतमाळच्या जिल्हा शल्य चिकित्सकालापाठविलेल्या ईमेल ने खळबळ उडाली आहे.
चीन पासून निर्माण झालेला कोरोना व्हायरस सगळीकडे धुमाकूळ घालत असताना या जीवघेण्या व्हायरसच्या भीतीने होळी पासून सुरवात होणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी यात्रा स्थगित करावी असे निर्देश दिनाक 5 रोजी जिल्हाधिकारी व मुख्य सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत देण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने माहूर येथील सुफी संत हजरत बाबा सोनापीर यांचे उरूस मोहत्सव दिनांक पाच मार्चपासून सुरू होत असल्याने खबरदारीची पावली उचलणे गरजेचे होते. मात्र दिनांक दोन मार्च रोजी तहसील कार्यालय माहूर येथे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संसर्गजन्य असलेल्या कोरोना वायरस संदर्भात कुठलीच चर्चा झाली नाही.व खबरदारी साठी उपाय योजना करण्यात आली नाही.
अशात दिनांक ५ रोजी माहूर शहरात हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य संदल मिरवणूक काढून उरूस ची सुरुवात झाली. याच संदल साठी इराण-इराक विदेश यात्रा करून नागपुरात परतलेले व नागपूर येथील सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी त असलेले १४ लोकांपैकी सौदागर अश्फाक अहमद,सुलताना बेगम अश्फाक अहमद,हे दोन इसम डॉक्टरांना कोणतीच कल्पना न देता माहूर येथील दर्गाह वर गेल्याचे नागपूरच्या जिल्हा शल्यचिकित्सकाने यवतमाळच्या जिल्हा शल्य चिकित्सकाला काल गुरुवारीच एका ईमेल द्वारे कळविले.हा पत्र व्हाट्सअप वर व्हायरल झाल्यानंतर नागरिकात चर्चेला पेव फुटले असून वास्तविक त्या पत्रात या दोन्ही इसमांना कुठल्या आजाराची लागण असल्याचे उल्लेख नाही. मात्र डॉक्टरांच्या निगराणी तुन अचानक हे इसम कुठलीच कल्पना डॉक्टर न देता निघून गेल्याने हा प्रकार गंभीर झाला आहे.