हैदराबाद – राम मंदिराच्या मुद्द्यावरून ओवैसी आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू झाले आहे. “शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरते. त्यामुळे त्यांनी आपला जनाधार टीकवण्यासाठी अग्रलेखांच्या माध्यमातून मोदींवर टीका करण्याची रणनीती अवलंबली आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. तसेच, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अग्रलेख लिहायचे थांबवून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे. असे आव्हान ओवैसी यांनी दिले आहे. गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली होती. तसेच राम मंदिर बांधणे भाजपाला जमत नसेल तर आम्ही बांधून दाखवू, असे आव्हान भाजपाला दिले होते. तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यात अयोध्येला भेट देण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर देशातील राजकारण तापले असून, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर ओवेसींनी टीका केली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवैसीनी हैदराबातपुरतेच मर्यादित राहावे. राम मंदिर हे अयोध्येत बांधले जाणार आहे. हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.